जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  मागील चोवीस तासांत देशभरात 4 हजार 213 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 67 हजार 152  वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सोमवारी ही माहिती देण्यात आली आहे

देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 67 हजार 152  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 44 हजार 029 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 20 हजार 916 जण व एकजण स्थलांतरित आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 109 जणांचा समावेश आहे. रविवारपर्यंत देशभरात करोनामुळे 2 हजार 206 जणांचा बळी गेलेला आहे.

एकीकडे जग करोनाचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे. तर दुसरीकडं करोनावरील औषधासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी करोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकानं करोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.


“भारतानं ज्या पद्धतीनं करोनाची परिस्थिती हाताळली, त्यातून पुढील टप्प्याला यशस्वीपणे सामोरं जाण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला आहे. उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी आहे. भारतातील रुग्णसंख्या दुप्पटीचा वेग ११ दिवसांचा आहे. हा कालावधी म्हणजे प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी चांगली संधी आहे,” असं मत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केलं आहे.

करोनातून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे अधिक शिथिल करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी घेतला आहे. त्यानुसार, अतिसौम्य-सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल. फक्त गंभीर रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी तसेच अन्य वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे. तर, करोनाच्या महासाथीमुळे अनेक विकसित देशांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. भारतात अतिवाईट स्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असली तरी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केलेलेआहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने