◆ भीती मरणाची नाही तिरस्काराची

रात्री झोपताना तो हळद टाकून दूध घेत होता.
बायको हसली...
आणि मुलीला म्हणाली,
"बघ तुझा बाबा किती घाबरतो मरायला."
जेंव्हापासून कोरोना आला काय काय करतो. काढा काय पितो, हळद टाकून दूध काय पितो. रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून, लसूण काय, भिजवलेले बदाम काय, कडधान्य काय.
अरे,किती घाबरशील ?
बायकौ हसत म्हणाली.
त्याने उत्तर दिले.

"हे बघ एकतर मी घाबरत नाही.
याला घाबरणे नाही तर काळजी घेणे म्हणतात.
आणि हो मी घाबरतो
भीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते
बायको आणि मुलगी हसता हसता शांत झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली.


त्यांच्यासमोर पेपर टाकला आणि त्याने म्हटलं बघा

घटना एक

स्वतःच्या आईने आणि भावाने हजार किलोमीटर पायी चालत घरी आलेल्या मुलाला प्रवेश नाकारला

घटना दुसरी

मुंबईत एका व्यक्तीचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याची अंतिम इच्छा होती की त्याच्या गावात त्याचा अंतविधी व्हावा.
रीतसर परवानगी घेऊन प्रेत गावाला आणलं, परंतु गावकऱ्यांनी त्याला गावात येण्यास मनाई केली.
काकांकडे दुसऱ्या गावात परवानगी मागितली पण तिथेही नकार मिळाला.
शेवटी एक फॉर्मलिटी म्हणून एका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

खरचं किती चुकीची वेळ निवडली होती  मृत्यूने.

किती साधी इच्छा.
अापला देह आपल्या जन्मभूमीत शेवटचा विसावावा.
केवढं दुर्भाग्य. तेही नशिबात नव्हते.

घटना तिसरी

टीव्ही वर पाहिलेली. मन हेलावून टाकणारी.

एका डॉक्टरला (न्यूरोसर्जनला) रुग्णाची सेवा करता करता करोनाची लागण झाली व त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यांचे शव घेऊन त्यांचे डॉक्टर मित्र रुग्णवाहिका घेऊन इकडे तिकडे फिरत होते परंतु नागरिक त्यांना कुठेच अंत्यविधी करू देत नव्हते.
एवढेच नव्हे तर त्यानी रुग्णवाहिकेची तोडफोड केली.
ज्या डॉक्टरांनी सेवा करता करता बलिदान दिले त्याच्या देहाची अक्षरशः विटंबना होत होती.

शेवटी पोलीस बंदोबस्तात एकदाची  त्यांच्या शरीराने शेवटची विश्रांती घेतली.
त्यांचे डॉक्टर मित्र जेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी ते सांगत होते तेव्हा मला अश्रू आवरत नव्हते.
फार वाईट वाटलं

हे सगळं वाचलं पाहिलं की मला फार भीती वाटते. मरणाची नाही तर त्यानंतर आपल्या कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या तिरस्काराची. मरणाची भीती मला कधीही वाटली नाही
अाणि वाटत नाही पण आता मात्र हे नक्की वाटतंय की मरण या काळात येऊ नये अाणि इतकीही काळजी घेऊन जर आलंच तर मी प्रशासनाला आधीच विनंती करेल, माझा मृतदेह घरच्यांना न देता डायरेक्ट विद्दुतदहिनीत नेऊन नष्ट करावा.
माझ्यानंतर माझ्या माणसांना माझ्या मृत्यूचं दुःख बाजूला सारून अंत्यसंस्काराची काळजी करायची वेळ यायला नको अाणि तो तिरस्कार पण त्यांच्या नशिबी यायला नको.

बायको निशब्द झाली होती

त्याने म्हटलं, आता कळलं, मी का एवढी काळजी घेतो.
भीती मरणाची नाही तिरस्काराची वाटते....


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने